गुरुवार, ६ जून, २०१९

रात्र

अशी व्हावी भेट तिची अन माझी
कातरवेळी सांजपावलांनी धरावी
वाट त्या अवखळ क्षणांची
अन घ्यावी ऊरभेट तनामनांनी

घट्ट मिटल्या त्या बालमुठीतून ओघळत जावेत जसे गोड क्षण...अगदी तसंच ओसांडून जातंय आयुष्य त्या काळाच्या वज्रमुठीतून.......प्रत्येक क्षण मृत्यूरूपी सत्याकडे घेऊन जातोय....आणि आपण आहोत की.......आपल्याच व्यस्त जीवनात त्या क्षणाची दखल देखील घेत नाही......ती अजून त्याच रम्य स्वप्नविश्वात विरघळली रात्र अन अजून त्या रात्र पाहरेकर्यांचे "जागते रहो" चे बोल कानी पडत आहेत.....पण अजून तो काही त्या धुंद स्वप्नातून जागा होत नाही.....कसलीशी मादकधुंदी त्याच्या अणूरेणुत पुरेपूर पसरलीय की जिच्यातून बाहेर येण्यास तो धजावत नाहीये......तो जर का असाच अजून काहीवेळ त्या धुंदीच्या बाहुपाशात गुरफटून राहिला तर त्याचे जगणं कदाचित कठीण होईल हे तो ही जाणतो आणि ती रात्र ही..... असेच त्याच्या आयुष्यातील विस्तवाचे अन वास्तवाचे धगधगते निखारे तो फुंकर घातल जपेल अन तेवत ठेवेल त्या हृदयमंदिरातील दिवा जो कैक दिवसापासून त्याला लखलख उजळतो......ते त्याच्या मनातील तिचे अन त्याचेही भावविश्व अजून तसेच राहील त्याच्या मनी त्या तलम वस्रागत ज्याने दिलीय त्याला ऊब अन जगण्याची नवी दिशा.....पण......."पण"........नावाच्या दुःखर्या जखमेवर त्याला जालीम औषधी मिळाली तर...... ती त्याला मिळेल कदाचित त्या गल्लीबोळात जिथं त्याची ती राहत होती.....तिथेही मिळेल त्याला ती दवा जिथं त्यांची भेट होतं होती.....मिळेल ते औषध पुस्तकांच्या अन वृक्षवल्लीच्या पानाफुलातून......अन निराशेच्या काळोखाला चिरत जाणाऱ्या काळ्याच अक्षरातूनही पुस्तकांच्या.........आता अशीच भेट होईल त्याची तिच्याशी गोड स्वप्नं पाहण्यास जेव्हा मिटतील त्याच्या चक्षूंवरच्या दोन पाकळ्या उद्या फिरून कधीच न उघडण्यासाठी..... 😔

✍श्रीकांत पाटील.

बुधवार, ५ जून, २०१९

आई

तिचं जरा ऐकावं आणि
तिचंही एक काव्य रेखाटावं
बाप समजून घेतांना तिचं
दुःख अक्षरांतून मांडावं

विचारांच्या कोलाहलातून
एक विचारपुष्प तिला वाहवं
वाहतांना पुष्प विचाराचं
माझंच एक पुष्प व्हावं

जन्म तिच्या उदरातून घेतांना
तिला रोज हृदयात जपावं
झालाच सामना बापाशी तर
हळूच तिच्या पाठी लपावं

दाटलाच काळोख कधी तर
तिच्या समीप बसावं
ती तर आहेच समई
कधी आपणच आई व्हावं

बाप कवितेतून रेखाटतांना
तिचंच स्मरण करावं
जमलंच कधी तर
प्रत्येकजन्मी तिच्याच पोटी
जन्माला यावं

✍ श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

(नर्स) परिचारिका

सकाळी लोकलच्या चाकरमान्यांच्या गर्दीत
ती सामावत जाते रोज होऊन भाग गर्दीचा
झुंजूमुंजू पहाटेच गोड स्वप्न पाहत आपण
निवांत झोपून असतो घरी तिचा नवराही
ती पळत राहते रुग्णसेवेच व्रत घेऊन
पायाला चाक लावल्यागत आणि घेत
असते काळजी साऱ्यांची कुणी आवाज
देतं सिस्टर सलाईन संपली कुणी
म्हणतं ताप आलाय तर कुणी
डोकेदुखीची तक्रार घेऊन समोर
उभा राहतो डोकं गच्चं दाबून
दोन्ही हातांनी ती त्याचीही
काळजी घेत देते गोळी पॅरासिटामॉलची
अन पळत राहते त्या सलाईन संपलेल्या
बाबा, आजोबा, काकांकडे त्यांचीही
ती विचारपूस करते पाहते ताप
अन रक्तदाबही स्वतःचा किंचितही
वाढू न देता अन चेहऱ्यावरील हसू
थोडंही ढळू न देता...ह्या साऱ्या
धावपळीत ती तिचे दोन घासही विसरते
तेवढ्यात जगताला वेळ दावणाऱ्या
घडाळ्यात वाजतात दुपारचे दोन
शिफ्ट बदलते ती घरी जाते परत
नवी ऊर्जा घेऊन परत सेवा करण्यासाठी
इतकी सारी करून  धावाधाव  दिसत
नाही कुणास तिच्या पांढऱ्या गणवेशातील
साध्वी, परी, आई अन नारीही.......

श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

शेतकरी आणि शिक्षक

देशाचं नाव उज्ज्वल व्हावं म्हणून
झिजवत राहतो खडू फळ्यावर
दाखवतो मार्ग ज्ञानाचा देशप्रेमाचा
आईगत माया करतो अन सुकर
करतो पाथ यशाचा,उज्वलतेचा
त्याच्या लगतच्या दोन बाहुंची
बेरीज असते बरोबर त्याच्या
कर्तृत्वाच्या बेरजेइतकी अन
ज्याच्या शिकवणुकीने साऱ्या
जगताच्या अज्ञानाला निःशेष
भाग जातो तो गुरू  असतो...
असाच एक गुरू  दिसतो  मला
माझ्या शेतकरी बापाच्या आत
जसा काळ्या फळ्यावर माझा
गुरू  गिरवत  असतो  अक्षरं सोनेरी
तसाच काळ्या मायभूमीतून तो
पिकवतो जगताच पोट भरणारी
दाणे हिरवी....

अखिल विश्वातील अज्ञानाचा अंधकार
दूर करणार्या शिक्षकास आणि मानव जातीचे उदरभरण करणार्या बळीराज्यास मानाचा मुजरा...

✍ श्रीकांत पाटील

तु सोबतीला असलीस की

नात्याच्या स्वर्गीय रेशीम गाठींना
आपण मनोमन घट्ट करत असतो
जेव्हा राणी तू असतेच ना संगती माझ्या
तेव्हा लाखो चांदण्या सोबत असूनही
आकाशीचा तो चंद्रही हिरमुसतो
लपतो ढगाआड अन ग्रहनांचा
शाप तो उपभोगतो......

ग्रह, तारे,गुण, नक्षत्रही जुळून आले
तु झालीस राणी अन मी राजा झालो

श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

पाऊस

#बरसात_के_दिन_आयेगे...

घामाच्या धारांनी चिंब चिंब भिजलेल्या तनामनाला मनोमन यथोचित भिजवणाऱ्या उनाड,खोडकर,बालिश आणि अश्या बऱ्याच उक्तींनी रंगलेल्या पावसाचे वेध लागले असतील. तो केव्हा,कित्ती,कसा येईल त्याचा मुक्काम कित्ती दिवसांचा असेल यांचे अंदाज एव्हाना हवामान खात्याने वर्तविलेला असेलही.
   भारतासारख्या कृषिप्रधान देशातील लोकांना पावसाचे महत्व अधिक हे वेगळे सांगायला नको. आपलं भविष्य पावसावर अवलंबून असल्याने तो आपल्याला कथा,कविता,गाणी,चित्रपट अन पुस्तकांच्या पानापानातून सतत भेटत असतो.
   काही काही झोपळू जीवांना पावसाळा त्यातल्यात्यात उन्हाळा आवडत नसतो. हिवाळ्यात कसलीच कटकट नसते ना ऊन लागतं ना चिखलाचे पिचपीच. मस्तपैकी भरपेट खा अन ब्लँकेट घेऊन डोळे भरून झोपा. पण पाऊस आवडणारे ही मोजकेच असतात अस्मादिकांसारखे.
   रिमझिम पावसात आपल्या मनाच्या राणीस बाईकच्या मागे बसवून येथेच्छ भिजत लॉंग ड्राईव्ह वर जाऊन टपरी वरचा आलं गवतीचहा मिश्रित वाफाळता चहा, खमखमीत भज्जी,वडा यांची मज्जा ब्लँकेट घेऊन उबदारपणे जोपणाऱ्या कुंभकर्णना अनुभवता येत नाही. पावसाळ्यात हिरवा शालू परिधान केलेली वनराई, उमललेली नाना तर्हेची अन रंगाची फुलं, विविध रंगाची पिसं असलेली फुलपाखरं आपल्या फुलपाखरासोबत याचि डोळा पाहण्याची मौज काय वर्णावी.
   ह्या ऋतुने कितीतरी कलाकारांना त्यांची कला उस्फूर्तपणे सादर करण्यास प्रोत्साहित केले ह्याची जर का नोंद घेतली तर टिपटीप बरसा पाणी ह्या गाण्यावर नखशिखांत ओलीचिंब होऊन नाचणाऱ्या रविना टंडन पासून  "मेघदूत" लिहणाऱ्या कवी कालिदास,"हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालिचे" अशा पाऊस कविता लिहणाऱ्या बालकवी "त्रंबक बापूजी ठोंबरे" पर्यंत अशी बरीचशी नावं आपल्याला सापडतील.
   पावसाळा बऱ्याच कवींना कविता लिहण्यास भाग पाडतोच पण ती लिहलेली कविता जगण्यास ही दिलासा देतो. पाऊस कधी लेखक कवी लोकांना बाप म्हणून भेटतो तर कधी त्यात त्यांना प्रेमळ मायाळू आई ही गवसते. तर कधी हवीहवीशी वाटणारी प्रियसी सुद्धा.
   पहिला पाऊस बच्चेकंपनी ला गच्चीवर बोलवतो अन त्यांना नाचवतो पहिल्या पावसाने आपल्यातील हरवलेलं बालिश मुल ही डोकावत. पण वय आड आल्याने आपण त्या बलिशपणाला मुरड घालून जगण्यातलं एक सुंदर पान गमावून बसतो. कसलीही अन कुणाचीही पर्वा न करता डोक्यावर पडणाऱ्या पाऊसधारात जो नाचतो तोच खऱ्या अर्थाने पावसाची मज्जा उपभोगतो. नाहीतर खिडकीच्या बाहेर तळहातावर इवलुस तळं साचावण्यात तो आनंद मिळत नाही.
   आपल्याला म्हणजे तुमच्या माझ्या सारख्या सामान्यजनांना पाऊस जरी वेगवेगळ्या रंगारुपात भेटत असला. तरी त्याची खरी ओढ व गरज साऱ्या जगाची पोटाची खळगी भरणाऱ्या बळीराज्यास अधिक असते. त्याच्याही रानावनात शेतात हा पाऊससखा बरसतो. अन डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूथेंबांना मोतीयाचे रूप देतो.
    प्रामुख्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासून मिळणार पाऊस आपल्या जगण्याची दशा अन दिशा ठरवत असतो. इतकेच नाही तर साऱ्या हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती ह्या वाऱ्यांपासून मिळणाऱ्या पावसावर अवलंबून असते. ह्या बरसणाऱ्या पावसावर तापमान, हवेचा दाब, त्यामुळे बदलणारी हवेची दिशा ह्या मूलभूत बदलांचा पाऊस सक्रिय होण्यास अथवा त्यास विलंब होण्यास मुख्य सहभाग असतो.
   पाऊस हा प्रत्येकाला वेगळा दिसतो. तो वेगळा भासतो. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो. कधी तो आल्हाददायक असतो, तर कधी तो रौद्र रूप धारण करतो. कुण्या एकेकाळी हाच सखा इतक्या गडगडाटासह बरसायचा की आम्हा बच्चेकंपनीला आई, आजी त्या गडगडट्याची भीती घालून निजवीत असतं. कधी दुपारी इतक्या घामाच्या धारा लागायच्या की तेव्हाच उमजून जायचं की आता तो येईल. आणि तो यायचाही वाऱ्या वादळावर स्वार होऊन विजेचा लखलखाट करत ओसंडायचा पाऊस आपल्या अंगणात,रानात अन मनातही....त्याच्या येण्याआधी त्याच्या येण्याचा निरोप घेऊन य्यायची त्याची प्रियसी तिच्या पाऊसओल्या वासानेच मन ओतप्रोत भरून येई. मग तो मातकट वास आपण आपल्या दोन्ही नाकपुड्या डोळे मिटून पित असू. आताआताशी तो दुर्मिळ मातीचा सुवास लोप पावत चाललाय की काय कुणास ठाऊक. बरं तो सुवास कुठल्याही अत्तरवाल्या चाचू,भाईजान कडे मिळत नाही म्हणून तो खरेदीही करून ठेवता येत नाही. तो निसर्गाच्या, झाडांच्या फॅक्टरीतच बनविला जात असतो. अन आपण आपल्या सुखसोयीसाठी जंगल च्या जंगल नष्ट करत चाललोय. कदाचित आपल्या पुढील पिढ्याना ह्या पाऊस ओल्या मातीचा सुवास डोळे मिटून नाकपुड्या ओढून हुंगण्याची संधी मिळणार नाही.
   प्रियजनहो अजून ही हातातून वेळ गेलीय असं म्हणता येणार नाही. आपल्या देशाला खास पावसाळा हा चार महिन्यांचा ऋतू निसर्गाने बहाल केला आहे. तो त्याच्या मुक्तहस्ताने आपल्या पर्यंत येतोही आपण त्याचे योग्य नियोजन केले. जंगलतोड थांबवून जंगलवृक्षसंवर्धन केले तर काळवंडत चालली आपली धरणी माता परत एकदा सुजलाम सुफलाम होईल अन्यथा आपण झाडांवर कुऱ्हाड चालवत नसून भविष्यात येणाऱ्या आपल्याच मानव प्रजातीच्या अन ओघानेच चराचर सृष्टीच्या पायी कुऱ्हाड चालवत जाऊ ह्याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी लागेल.

✍️श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

लेखन आणि ती

तुझ्या लालस गोड ओठांवर
शब्द माझे सदोदित यावेत
मी गिरवावेत सुखद क्षण
तुझ्याच नेत्रकड्यातून ते विरघळावेत
लिहावेत क्षण काही दुःखाचेही
लिहण्याच्या ह्या प्रवासातच तुझ्या
चिरतरुण आनंदाचे क्षण गवसावेत
क्षणाक्षणांनी एकत्र येऊन
आयुष्याने आकार घ्यावा
सुखी करणारा एखादा क्षण
आपल्याही जन्मी यावा...
क्षणभंगुर ह्या श्वासांच्या कहाणीचा
सत्कार व्हावा असा काही
सुगंधित व्हावा वारा अन दुमदुमाव्यात
दिशा दाही

✍️श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील